ॐ गं गणपतये नम:।
भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथिपासून भाविक वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करतात. दीड दिवस ते दहा दिवसांपर्यंत (अनंत चतुर्दशीपर्यंत) हा उत्सव साजरा केला जातो. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी हॅपी होम, खार येथे पवित्र भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने गणोशोत्सव साजरा केला जातो.
श्रीगणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच हरतालिकेच्या दिवशी गणपतीचे आगमन होते. गणपतिची उत्सवमूर्ती ही बालगणेशाची असून पाठीशी अनसूयानन्दन दत्तात्रेयांची सुहास्यवदन मूर्ती असते. ह्या दोन्ही मूर्ती पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) असतात. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गेली अनेक वर्षे कार्यकर्ते रामनामवहीच्या कागदाच्या लगद्यापासून मोठ्या प्रमाणावर इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवून आपली सेवा श्रीचरणी रुजू करत आहेत.
पूज्य सूचितदादांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान या उत्सवाची तयारी काही महिने आधीपासूनच करतात. पूर्वनियोजनामुळे श्रीगणेशाच्या आगमनापासून ते पुनर्मिलपापर्यंतचा सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे संपन्न होतो.
बापुंच्या घरच्या गणेशोत्सवात सामील होण्याची, गणपतीचे दर्शन घेण्याची प्रत्येक श्रद्धावानाची उत्कट इच्छा असते. अनेकांच्या घरी किंवा गावाला गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यामुळे बापुंच्या घरच्या दीड दिवसाच्या गणेशोत्सवात सामील होणे सर्वांनाच शक्य होत नसे. श्रद्धावानांच्या प्रेमळ आग्रहाखातर बापुंच्या घरी साजरा केला जाणारा गणेशोत्सव गेल्या काही वर्षांपासून दीड दिवसाऐवजी अडीच दिवसांपर्यंत साजरा केला जाऊ लागला.